Breaking

Post Top Ad

गुरुवार, २३ जुलै, २०२०

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू

यवतमाळ: जिल्हयामध्ये आतापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार ६१६ शेतकऱ्यांना १०६० कोटी ८२ लाख खरीप पीक कर्जवाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७६ हजार २४१ शेतकऱ्यांना ४५३ कोटी १३ लाख पीक कर्जवाटप केले असून ही टक्केवारी ८२.६८  आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करणेसंबंधीची कार्यवाही देखील बँकेने सुरु केली आहे. याअंतर्गत १०६ पात्र शेतकऱ्यांना ६० लाख ६८ हजार पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन केले असून पुढील १५ दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांना बँकेमार्फत पीक कर्जवाटप करण्यात येणार आहे. यासाठी कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांनी कर्जवाटपासबंधाने संबंधीत संस्थेचे सचिव यांचेशी संपर्क करुन आवश्यक कागदपत्रे सादर करावी.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत जिल्ह्यामध्ये १ लाख ८ हजार शेतकरी कर्जमुक्तीकरीता पात्र आहेत. कर्जमुक्तीची रक्क्म ७४५ कोटी आहे. आता पर्यंत एकूण १,०१६८ शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड झाली आहे. यातील ८९,८०४ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी प्राप्त झाली असून यापैकी ७६,१५३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेतले आहे. तर १३,६५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण व्हायचे आहे, अशा शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी सेतु सुविधा केंद्र, संबंधीत बँक शाखा, येथे जाऊन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण ६४,०८५ शेतकऱ्यांना ४७२ कोटी ६९ लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७,२५६ शेतकऱ्यांची रु.१२२ कोटी ५९ लाख कर्जमुक्ती झाली आहे. कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांचे लेजर अपडेशन करुन घेण्याची कार्यवाही बँक स्तरावर सुरु आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप मिळण्याचे दृष्टीने संबंधीतांनी बँक शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कळविले आहे.

1 टिप्पणी:

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad