Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून मोठ्या हालचाली सुरू आहेत. Sunetra Pawar यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची मागणी, Praful Patel आणि Sunil Tatkare यांच्या भूमिकेवर लक्ष.
मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, पक्षाचे भविष्यातील नेतृत्व नेमके कोणाच्या हाती जाणार, यावरून अंतर्गत गोटात तीव्र चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार या पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या असून, आता त्यांच्याकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी पक्षातील आमदारांनंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांकडूनही पुढे आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या ३० हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी लेखी मागणी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे केली आहे. पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पत्र पाठवण्यात आले असून, कठीण काळात पक्षाला एकत्र ठेवणारे, संयमी आणि सक्षम नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवार योग्य असल्याचा ठाम विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्रे प्रफुल पटेल यांच्या हाती जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचे वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, नंतर गोयल यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत चुकीची माहिती मिळाल्याचे मान्य केले आणि पक्ष सध्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातच काम करत असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’नेही कडाडून टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनाचे सुतक संपण्याआधीच सत्ता हस्तांतरणाची घाई दाखवण्यात आल्याचा आरोप करत, हे सर्व भाजपच्या राजकीय प्लॅनिंगचा भाग असल्याचा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असल्या, तरी सत्तेचे इंजिन आणि रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस यांच्या हातीच राहणार का, असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
सामनाच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू असून, या संघर्षातून पक्षाला बाहेर काढण्याची खरी कसोटी आता सुनेत्रा पवारांसमोर आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली प्रशासकीय पकड, अर्थ व नियोजन खात्याचा अनुभव आणि त्यांचा वेग सुनेत्रा पवार दाखवू शकतात का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
एकीकडे पक्षातील पदाधिकारी आणि आमदार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहत असताना, दुसरीकडे भाजपच्या भविष्यातील राजकीय रणनीतीवरही चर्चा रंगली आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याने, त्याआधी शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा सामनातून करण्यात आला आहे. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आणि नेतृत्व टिकवण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार कितपत समर्थपणे पेलतात, यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
एकूणच, अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस एका निर्णायक टप्प्यावर उभी असून, सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्री म्हणूनच नव्हे, तर पक्षाच्या सर्वोच्च नेत्या म्हणून पुढे येतात की नाही, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे.
------
