धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू बुद्रुक येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी महायुती सरकारने अडीच एकर जमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यामुळे ५३२ कोटींच्या विकास आराखड्याला गती मिळणार आहे.
मुंबई : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने पुण्यातील के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील अडीच एकर जमीन समाधीस्थळासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समाधीस्थळ विकासाच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे.
महसूल विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, के.ई.एम. रुग्णालयाच्या मालकीची वढू बुद्रुक येथील गट क्रमांक ४४७ आणि ४४८ मधील एकूण ०.८७ हेक्टर २० आर जमीन छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाच्या विकासकामांसाठी तात्काळ हस्तांतरित केली जाणार आहे. या बदल्यात शासनाने के.ई.एम. रुग्णालयाला कोंढापुरी (ता. शिरूर) येथील गट क्रमांक ६५५ मधील ०.८१ हेक्टर जमीन ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून कब्जा हक्काने देण्यास मान्यता दिली आहे. ही जमीन विशेष बाब म्हणून महसूलमुक्त आणि भोगवटामूल्यरहित देण्यात आली असून तिचा वापर केवळ मंजूर वैद्यकीय प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तीन वर्षांच्या आत त्या ठिकाणी काम सुरू करणे आवश्यक असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथील विकास आराखडे तयार करताना स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार या दोन्ही ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल ५३२.५१ कोटी रुपयांचा व्यापक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामुळे संभाजी महाराजांच्या बलिदानाची स्मृती जपणारे भव्य आणि दर्जेदार स्मारक उभे राहणार आहे.
वढू बुद्रुक येथील नियोजित विकास आराखड्यानुसार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम आणि बलिदान मांडणारे अत्याधुनिक संग्रहालय उभारले जाणार आहे. यासोबतच ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध असे ग्रंथालय, ८२ आसन क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह आणि १०-डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्मारक परिसरात एक वैशिष्ट्यपूर्ण ‘अदृश्य शिल्प’ उभारण्यात येणार असून भीमा नदीच्या काठी सुमारे १२० मीटर लांबीचा घाट बांधण्याचेही नियोजन आहे.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास व्हावा, ही सर्व समाजाची अनेक वर्षांची मागणी होती. संभाजी महाराजांचे समाधीस्थळ त्याग, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असून या निर्णयामुळे नियोजित विकास आराखड्याला मोठी गती मिळणार आहे. राज्य सरकार महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-----------------------------------------
