मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना भाजपने निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने शंभरी पार केली आहे. राज्यातील तब्बल 100 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले असून निकालाच्या आधीच भाजपने मोठी ताकद दाखवली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण आणखी तापलेले दिसत आहे.
बिनविरोध निवडीमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला चव्हाण यांची माहिती, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळेच भाजपला निवडणुकीपूर्वीच इतकी मोठी बिनविरोध ताकद मिळाली आहे." राज्यात अनेक ठिकाणी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार निर्विरोध निवडून आले.
धुळे : दोंडाईचा नगरपरिषद पूर्णपणे भाजपच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद राज्यातील पहिली संपूर्ण बिनविरोध निवडून आलेली नगरपरिषद ठरली आहे.
येथील सर्व 26 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा नगरपरिषदेत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत देखील बिनविरोध झाल्याचे समोर आले आहे.
विभागनिहाय बिनविरोध विजयी नगरसेवक
राज्यातील भाजपचे बिनविरोध निवडले गेलेले नगरसेवक : 100 भागानुसार आकडेवारी : कोकण - 4 उत्तर महाराष्ट्र - 49 पश्चिम महाराष्ट्र - 41 मराठवाडा - 3 विदर्भ - 3
तसेच 3 नगराध्यक्ष देखील बिनविरोध निवडले गेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
यात नामनिर्देशन दाखल करण्याची तारीख 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर होती छाननी : 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत झाली.
अपील नसलेल्यांसाठी माघार घेण्यासाठी आजची : 21 नोव्हेंबर ही तारीख होती. अपील असलेल्यांसाठी ती : 25 नोव्हेंबर 2025 आहे. मतदान : 2 डिसेंबरला असून मतमोजणी : 3 डिसेंबर 2025 रोजी आहे.
राज्यातील अनेक भागांत जोरदार लढती रंगल्या असल्या तरी भाजपला मिळालेली ही बिनविरोध कामगिरी पक्षासाठी मोठी आघाडी मानली जात आहे.
------------------------
