नवी मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर ICC महिला वनडे विश्वचषक 2025 आपल्या नावे करत इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारताने पहिल्यांदाच हा किताब पटकावला. मात्र या ऐतिहासिक विजयानं फक्त मैदानावरील 11 खेळाडूंच्या नव्हे, तर त्या सर्वांच्या मेहनतीचा आणि भावनेचा सन्मान केला आहे, जे संपूर्ण स्पर्धेत संघाचा भाग होते पण एकही सामना खेळू शकले नाहीत.
हे खेळाडू म्हणजे क्रिकेटमधील ‘अनकहे नायक’ ज्यांचं योगदान स्कोअरबोर्डवर दिसत नाही, पण त्यांच्या मेहनतीचा परिणाम प्रत्येक विजयात उमटतो. त्यांची भूमिका मैदानाबाहेर असली तरी ते संघाच्या मानसिक बळाचा, रणनीतीचा आणि एकजुटीचा पाया असतात.
भारतीय क्रिकेटमध्ये अशा खेळाडूंचा इतिहास 1983 च्या पुरुष विश्वचषकापासून सुरू होतो. कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले तेव्हा सुनील वालसन हा संघाचा सदस्य होता. मात्र त्याला एका सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तरीसुद्धा तो भारताचा पहिला असा खेळाडू ठरला ज्याने ‘खेळल्याशिवाय विश्वचषक जिंकला’.
यानंतर 2003 च्या विश्वचषकातही अशीच कहाणी पाहायला मिळाली. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत फाइनलपर्यंत पोहोचला, पण संजय बांगड आणि पार्थिव पटेल या दोघांना एकही सामना खेळता आला नाही. तरी त्यांनी संपूर्ण मोहिमेत संघाच्या तयारीत, ड्रेसिंग रूमच्या वातावरणात आणि खेळाडूंना मानसिक आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महिला क्रिकेटमध्ये ही परंपरा 2005 विश्वचषकापासून दिसून येते. त्या वेळी भारत पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्या संघात करू जैन, अरुंधती किरकिरे आणि रीमा मल्होत्रा या खेळाडू होत्या ज्यांना स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. तरी त्यांच्या नावासोबत त्या ऐतिहासिक मोहिमेचं स्थान कायम राहिलं आहे ज्याने भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.
यानंतर 2017 मध्ये, मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारली. त्या वेळी नुजहत परवीन संघात होती, पण तिलाही मैदानावर उतरता आलं नाही. तरी ती संपूर्ण मोहिमेत संघाच्या उत्साहाचा भाग राहिली. भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी तो संघ भारतीय महिला क्रिकेटसाठी प्रेरणादायी ठरला.
आता 2025 मध्ये ही परंपरा अरुंधती रेड्डीने पुढे नेली आहे. जरी ती एका सामन्यातही खेळली नाही, तरी तिची उपस्थिती संघाच्या तयारीत, सराव सत्रांमध्ये आणि ड्रेसिंग रूममध्ये महत्त्वाची होती. तिच्या उर्जेमुळे संघात सकारात्मक वातावरण निर्माण झालं. खेळाडूंच्या आत्मविश्वासात तिच्या भूमिकेचं महत्त्व जाणवतं.
अशा खेळाडूंचं योगदान आकडेवारीत मोजता येत नाही. ते संघाच्या वातावरणाचा, आत्मविश्वासाचा आणि एकतेचा गाभा असतात. रणनिती तयार करताना, सहकाऱ्यांना प्रेरणा देताना आणि प्रत्येक क्षणी संघाच्या मागे उभं राहून ते विजयानं रूप घेतात.
भारताने 2025 मध्ये पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषक जिंकला पण हा विजय केवळ मैदानावरील 11 जणींचा नव्हता. तो त्या सर्वांचा होता ज्यांनी मैदानावर पाऊल ठेवले नसेल, पण मनापासून संघा सोबत राहिले. हेच खरे क्रिकेटचे ‘पडद्यामागील हिरो’ जे विजयाच्या प्रत्येक क्षणात, प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक उत्सवात सामील असतात.
