Breaking

Post Top Ad

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर !

शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर !

"मुझे मेरे हाल पे छोड दो असे ". असे म्हणण्याची पाळी  शिक्षकांवर आल्याशिवाय राहणार नाही.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या आणि पुणे व अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे ढोल वाजणे बंद झाले आणि सर्व मतदार संघात दि.१ डिसेंबरला मतदानाची प्रक्रियाही पार पडली. धुळे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघात काँग्रेसच्या अंबरीश पटेल यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी निवडणूक होत आहे. 

भाजपने अमरीश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देऊन लढवले आहे.काँग्रेसने अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्था या चार मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढती आहे. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात राजकीय पक्षांचे पदार्पण पहिल्यांदाच झाले असल्याने या मतदारसंघात मात्र निवडणुकीचा रंग काही वेगळाच होता. भाजपने डॉ. नितीन धांडे यांना तर महाविकास आघाडीने विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना लढवले आहे.डॉ.नितीन धांडे शिक्षक उमेदवार असल्याचा विरोधकांचा आरोप होता पण तो बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण नितीन धांडे यांनी दिले होते.दोन्ही राजकीय पक्षांमध्ये सरळ लढत असल्याचे चे चित्र रंगवण्यात आले असले तरी या मतदार संघात आतापर्यंत शिक्षक संघटनांचा बोल बाला असल्यामुळे या संघटनांचेही उमेदवार उभे आहेत.त्यामुळे निवडणूक सरळ न राहता बहुरंगी झाली आहे. नुटा,विजुक्टा आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अशी युती या मतदारसंघात असायची.विरोधात महाराष्ट्र शिक्षक परिषद असायची. परिषदेला भाजप चा पाठींबा असायचा.मात्र यावेळी भाजपने आपला उमेदवार उभा केला आहे.

प्रा.न.मा.जोशी । ८८०५९४८९५१

परिषदेनेही उमेदवार उभा केला आहे. भाजपने उमेदवार उभा का केला असा प्रश्न महाराष्ट्र शिक्षक परिषदेने उपस्थित केला होता. बोनकुदले परिषदेचे उमेदवार आहेत .माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या माध्यमिक शिक्षक संघानेही प्रकाश काळबांडे यांना उमेदवारी दिली आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जवळ आपला उमेदवार नसल्याने उमेदवार इम्पोर्टेड असल्याची टीका विरोधकांनी केली होती. शिक्षक संघात कार्यकारिणीत असलेले सदस्य यापूर्वी निवडणूक लढत होते पण यावेळी शिक्षक संघात इच्छुक उमेदवार नसल्याने संघाने उमेदवार इम्पोर्टेड केला आहे अशी टीका झाली.दुसरीकडे विजूक्टाचे उमेदवार डॉक्टर अविनाश बोर्डे उभे असून त्यांना नुटाने पाठिंबा दिला आहे .नुटा चे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार प्रा. बी.टी.देशमुख यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा घेतल्या त्यामुळे जोरदार चैतन्य निर्माण  होऊन निवडणुकीत रंगीत आणली.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात फुट पडून नव्यानेच स्थापन झालेला माजी आमदार वसंतराव खोटरे यांचा पश्र्चिम  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ मैदानात असून त्यांचे उमेदवार विकास सावरकर मैदानात आहेत.


भाजप नेते माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे निवडणुकीत उभ्याा आहेत.एकुण सत्तावीस उमेदवार मैदानात आहेत.तीन तारखेला मतमोजणी नंतर कौन बनेगा आमदार चे चित्र स्पष्ट होणार आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मतदारसंघात राजकीय पक्षांनी उडी घ्यावी काय हा विषय जोरदार चर्चेला आला.अशिक्षक उमेदवारांनी ऊभे रहावे काय हाही विषय चर्चेला आला.या निवडणुकीत काही अश्लाघ्य प्रकारही घडले.तोही फार नींदेचा विषय होता.मात्र अशाही उमेदवारांना काही मते नक्कीच मिळणार आणि त्यातून शिक्षक बांधव कसा आहे हे दिसणार. सारेच एका माळेचे मणी आहेत की काय ? असे चित्र होते. ज्या संस्थाचालकांनी आठ आठ महिने शिक्षकांचे पगार दिले नाहीत, प्रश्न सोडवले नाहीत,नियुक्त्या करताना लाखो रुपये उकळले, अशांना निवडून देणार काय हाही प्रश्‍न चर्चेत होता.र्निवडणूक काळातील आरोप-प्रत्यारोपांच्या झालेले वातावरण आता निवडले आहे.निवडणूक काळात अशा प्रकारच्या आरोप- प्रत्यारोपांनी वातारण तापतच असते. त्याशिवाय निवडणुकीत जिवंतपणा आला असे वाटत नाही. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न या निवडणुकीने जो निर्माण केला आहे तो म्हणजे शिक्षक संघटनांचे भवितव्य पणास लागले आहे. 


विधान परिषदेतील ७८  पैकी सात शिक्षक आमदार काय  बदल घडवणार असे आपल्याला वाटत असले तरी परिषदेचा इतिहास लक्षात घेता आज अध्यापक प्राध्यापकांना  जी वेतन श्रेणी मिळत आहे, आणि सेवानिवृत्ती योजना लागू झालेली आहे, सुगीचे दिवस आले आहेत त्याचे सारे श्रेय या शिक्षक आणि पदवीधर आमदारांना जाते. विशेषतः प्रा. बी. टी. देशमुख यांचे कार्य म्हणजे विधान परिषदेची आवश्यकता काय या प्रश्नाचे उत्तर आहे .म्हणूनच सध्या शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नुटा,विज्युक्टा,विमिशिसं, महाराष्ट्र शिक्षक परिषद या संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायच्या आणि आहेत.उमेदवार कोणत्याही  संघटनेचा निवडून येवो मात्र तो बांधिलकी असलेल्या शिक्षक संघटनेचा असल्यामुळे संघटनेचे महत्त्व अधोरेखित होत असे .    दिवाकर राव पांडे भाजप समर्थित उमेदवार होते नंतर ते भाजपचे अधिकृतपणे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष झाले होते. सभागृहात शिक्षकांशी असलेल्या बांधीलकिशी त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही असे प्रमाणपत्र खुद्द नुटा आमदार बी टी देशमुख एका सभेत दिले होते. शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आमदार असल्या मुळे त्यांची बांधिलकी शिक्षकांशी असायची,मग विचारसरणी मात्र कोणतीही असो अशी स्थिती होती. राजकीय पक्षाच्या उमेदवाराची बांधिलकी पक्षाशी असते. ते शिक्षकांना न्याय देऊ शकतील काय असा प्रश्न चर्चेत होता. आता मात्र या मतदार संघात राजकीय पक्षांनी घेतलेली उडी, पैसा आणि मधुशाला ,सोमरस यांचा महापूर चिंतेचा विषय बनला आहे.हे सारे लक्षात घेता शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्र्न निर्माण झालेला आहे.  शिक्षक संघटनांनी यावर आत्मपरिक्षण केले पाहिजे. आपले अस्तित्व नाहीसे होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. निकाल काहीही असो, उमेदवार कुणीही निवडून येवो, त्याने मात्र या सर्व शिक्षक संघटनांशी संपर्क ठेवून  शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या निवडणुकीला अर्थ राहील.अन्यथा विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व देण्याच्या घटनाकारांच्या उद्देशाची आम्ही ऐशी तैशी केली असेच म्हणावे लागेल.शिक्षकांनी सुद्धा त्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.नाहीतर

लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad