Breaking

Post Top Ad

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

अपरिचित बाळासाहेब ठाकरे

 

अपरिचित बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटले की शिवसेना प्रमुख म्हणुन  बाळासाहेब ठाकरेंची छबी आपल्या समोर उभी राहते. सभेला लाखो लोकांच्या उपस्थितीत विरोधकांवर खास 'ठाकरी' शैलीत तुटून पडणारे बाळासाहेब आपल्याला आठवतात. करारी, निर्भीड आणि कोणाला काय वाटेल ह्याचा किंचितही विचार न करता सिगार ओढणारे बाळासाहेब ठाकरे एक दिलखुलास व्यक्ती म्हणून कोणालाही भावून जायचे. आज बाळासाहेबांचा आठवा स्मृतीदिन. बाळासाहेबांची आठवण होत नाही असा शिवसैनिक शोधून सापडणार नाही.बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीतील, शिवसेनेच्या वाटचाली बाबतचे अनेक किस्से चर्चिल्या जातात.ही किस्यांच्या अनुषंगाने बाळासाहेब ठाकरे सुपरिचित आहेत.बाळासाहेबांच्या आज आठव्या स्मृतिदिनानिमित्य बाळासाहेबांबद्दलच्या काही अपिरिचित बाबींचा आपण मागोवा घेणार आहोत. 


बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा, कदाचित याच कारणामुळे त्यांना पाट्या लावण्याची देखील सवय होती. जुन्या मातोश्री बंगल्यावर असणाऱ्या पाट्यांचा उल्लेख आजही कट्टर शिवसैनिक करत असतो.जुन्या सेना भवनात नजर वेधून घेणाऱ्या पाट्या आजही जुन्या शिवसैनिकांना स्मरणात आहेत. शिवसेनेत भांडणे नसावीत आणि असली तरी शिवसैनिकांनी ती आपापसात सामोपचाराने सोडवावी असा बाळासाहेबांचा कटाक्ष होता." आपपसांतली भांडणं घेवून शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखाना भेटू नये" ही पाटी अनेक दिवस जुन्या सेनाभवनात होती."मराठी माणसांनी आपल्या खोल्या मराठी माणसांनाच विकाव्यात" ही पाटी देखील सेना भवनात होती.मराठी माणसाने मुंबईतला आपला टक्का कमी होऊ देऊ नये हा त्यामागील उद्देश होता.जुन्या शिवसेना भवनाच्या जिन्याच्या प्रवेशद्वारावर अजून एक पाटी लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे “जो कुणी दारू पिऊन आलेला असेल किंवा ज्याच्या तोंडाला दारू प्यायल्याचा वास येत असेल त्याने शिवसेना भवनाची पायरीदेखील चढू नये.”अशा पाट्या बाळासाहेबांनी आवर्जून सेना भवनात तेव्हा लावायला लावल्या होत्या. 


राजकारणात येण्याचा बाळासाहेबांचा निर्णय हा अपघातानेच ठरला अस सांगितलं जातं. प्रबोधनकार ठाकरेंची जशास तस सुनावण्याची खास ठाकरे शैली बाळासाहेबांच्याकडे ओघाने आलीच होती. मात्र क्रिकेट, सिनेमा अशा विषयांवर गप्पा मारणं आणि व्यंगचित्र काढणे इतक्याच गोष्टींपुरते बाळासाहेब मर्यादित जगत होते.याच काळात “फ्रि प्रेस जर्नल” मध्ये नोकरी करत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने चित्र काढण्यास बाळासाहेबांना मज्जाव करण्यात आला. बाळासाहेबांनी तात्काळ नोकरीचा राजीनामा दिला आणि १९६० मध्ये “मार्मिक” स्थापना केली. मार्मिक मधून पुढे काय झालं तो इतिहास तुम्ही जाणताच. विजय तेंडूलकरांच्या नाटकांना बाळासाहेबांनी केलेला तत्कालीन विरोध हा जगजाहिर होता.कदाचित यामुळेच बाळासाहेब आणि विजय तेंडुलकरांचे संबध तितके चांगले नसतील असा अनेकांचा गैरसमज. पण प्रत्यक्षात चित्र मात्र उलट होतं. विजय तेंडूलकरांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी सामना मध्ये लिहलं होतं, “विजय माझा जानी दोस्त. मी मार्मिक सुरू केलं तेव्हा विजयची मला खूप मदत झाली. मार्मिक मधल्या चित्रपट परिक्षणासाठी 'सिनेप्रक्षान' हे नाव व  वाचकांच्या पत्रांच्या सदरासाठी 'दोन्ही कर जोडोन' अशी नावे विजय तेंडुलकरांनीच दिली होती.  

"भेटलेली माणसे घनदाट होती, थेट पोचायास कोठे वाट होती" 

असे बाळासाहेब आज जरी आपल्यात नसले तरी आठवणींच्या अनुषंगाने ते आज आपल्यातच आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न निघता आजही शिवसेनेची एकही सभा पूर्ण होत नाही आणि होऊही शकत नाही. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास जेव्हा लिहिल्या जाईल तेव्हा त्याचे मुखपृष्ठावर नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांना स्थान दिल्याशिवाय ते पुस्तक परिपूर्ण होणे शक्य नाही,अशी कामगिरी बाळासाहेब ठाकरे यांनी करून ठेवली आहे. अशा ह्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आठव्या स्मृतीदिना निमित्य माझा मानाचा मुजरा. 

कॅसेल अँड कंपनीने जगभरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा एक संग्रह प्रसिद्ध केला होता. बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रांमध्ये डेव्हिड लो यांना गुरू मानायचे. त्यांचा समावेश या यादीत होताच. पण सोबत भारतातून एकमेव व्यंगचित्रकार म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश देखील या यादित करण्यात आला होता.ही बाळासाहेब ठाकरे यांचे बाबतीतील बाब अनेकांना माहिती नाही.बाळासाहेब ठाकरे राजकारणात होते व कला क्षेत्रातील हा बहुमान बाळासाहेब ठाकरे यांना तेव्हा मिळाला होता. बाळासाहेबांच्या निधनानंतर दै.सामना मध्ये हि आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली होती,त्यांनी म्हटले होते की, “ शिवसेनाप्रमुखांच्या कधीही घरी गेलं की चेष्टा मस्करीत कसे दोन तीन तास जायचे, समजायचंच नाही. एकदा आम्ही त्यांना रुग्णालयात बघायला गेलो तेव्हा ते माझ्या वडीलांना म्हणजे शरद पवारांना म्हणाले,“ आज माझी मैत्रीण माझ्यासोबत नाही,”आणि दोघे हसायला लागले. तेव्हा मला कळलं, की मैत्रीण म्हणजे त्यांची सिगार.बाळासाहेब ठाकरे हे हजर जबाबी आणि मिस्कील होते.


बाळासाहेब कलाकार होते पण त्याहूनही अधिक कलाकारांची किंमत करणारे होते. २६ जुलै रोजी आलेल्या महापुरात जेव्हा शेजारच्या घरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या घरातील चित्र भिजली तेव्हा प्रथम माणसे पाठवणारे बाळासाहेब होते.असाच किस्सा जेष्ठ कलावंत वासुदेव कामत यांच्याबाबतीत घडला होता. बाळासाहेबांनी त्यांना विचारलं तूला काय देवू? क्षणभरात बाळासाहेबांचे फोटोग्राफर बाळ मुणगेकर यांना बोलावून वासुदेव कामत यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला. बाहेर पडताना बाळ मुणगेकर बासुदेव कामत यांना म्हणाले, आजपर्यन्त खांद्यावर हात टाकून साहेबांनी दोनच वेळा फोटो काढले. एक मायकल जॅक्सन आणि दूसरे तुम्ही. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर बाळासाहेबांची एक आठवण सांगतात ते म्हणतात,  मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती. त्यांच्यासमोर एक भाजी विक्रेता महिला होती. बिचकत, दबल्या आवाजात बोलत होती. बाळासाहेब तिला म्हणाले, चांगल्या चढ्या आवाजात बोल. मला दमात घेवून बोल. माझाच नगरसेवक आहे ना तुझ्या वार्डात, मग घाबरून कशाला बोलतेस? मी काय घाबरायला शिकवले का मराठी माणसाला? 


समीरण वाळवेकर यांनी १८ नोव्हेंबर २०१२ साली बाळासाहेब गेल्यानंतर महाराष्ट्र टाईम्सला सांगितलेला एक किस्सा, समीरण वाळवेकरांना पुण्याहून मुंबईला जायचे होते. सकाळी लवकर विधिमंडळाच्या अधिवेशन कव्हर करायचे होते. पण तेव्हा पुण्यामध्ये बाळासाहेब आणि इतर सहकाऱ्यांबरोबर रात्री एक दिड पर्यन्त त्यांच्या गप्पा रंगल्या. समीरण वाळवेकर मध्येच उठून जात असताना बाळासाहेब म्हणाले उद्या मी विमानाने जातोय. माझ्याबरोबरच सकाळी चला. दुसऱ्या दिवशी विमानात बाळासाहेबांना हवं ते विचारण्याची संधी वाळवेकरांना मिळाली. तेव्हा वाळवेकर म्हणाले, “साहेब सेनेतून भुजबळ कॉंग्रेसमध्ये गेल्याला आठ-दहा वर्ष झाली. आज काय वाटतं भुजबळांबद्दल? सॉरी तुमचे लखोबा लोखंडे.. ? 

तेव्हा बाळासाहेब म्हणाले,“खरच सांगतो. वाघ होता लोकांचा. उगाच डोक्यात राख घालून घेतली. पण तू पाहिलंस त्याला विधान परिषदेत! एकटा असायचा, पण पंचवीस कॉंग्रेसवाल्यांना भारी पडायचां !” तू पाहतोस ना कसा जातिवंत अभिनेता आहे तो ? तिकडे बेळगावात तर असा मेकअप करुन गेला की पोलिसांनासुद्धा कळले नाही हा कधी आला ते ! मोठा इरसाल माणूस. आज वाटते, सेनेत हवे होते म्हणून, तेव्हा बाळासाहेब म्हणाले,मला वाटून काय उपयोग ? पाणी वाहून गेलयं बरेच ! 


किल्लारीचा भूकंप झाला. संपुर्ण भारतातून मदतीचा ओघ चालू झालेला. त्या वेळी सर्व राजकिय पक्षाचे प्रमुख नेते किल्लारीला भेट देत होते. अशातच सोनिया गांधी देखील किल्लारीला आल्या. त्यावेळी त्यांच्या सोबत शिवराज पाटील देखील होते. बेघर झालेल्या छावण्यामधून सोनिया गांधी यांनी एका लहान मुलाला उचलून कडेवर घेतलं. लहान मुलांशी खेळताना त्यांच लक्ष मुलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटकडे गेलं. मुलाच्या गळ्यात बाळासाहेबांचा फोटो होता. तो पाहून सोनिया गांधींनी लगेच शिवराज पाटील यांना विचारणा केली, तुमच्या भागात बाहेरचे नेते लोकप्रिय कसे ?  अंबरीश मिश्र यांनी बाळासाहेबांविषयी सांगितलेली एक आठवण. अंबरीश मिश्र आणि बाळासाहेब एकाच व्यासपीठावर होते. अंबरीश मिश्र यांनी सुरेश भटांचा एक शेर उध्दृत केला. तात्काळ बाळासाहेबांनी अंबरीश मिश्र यांना तो विचारला. तो श्रीकांतला ऐकवं अस आग्रहाने सांगितलं. कदाचित तो शेर बाळासाहेबांसाठी रचला असावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad