Breaking

Post Top Ad

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

जिल्ह्यात दिवाळी करिता प्रशासनाने जारी केले नियम

जिल्ह्यात दिवाळी करिता प्रशासनाने जारी केले नियम

यवतमाळ : कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दिवाळी उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने निर्गमीत करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना यवतमाळ जिल्ह्याकरीता खालीलप्रमाणे लागू करण्यात येत आहे.

मोठ्या शहरामध्ये व ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण / उत्सव नागरिकांनी अत्यंत साध्या पध्दतीने व एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिवाळी उत्सवसुध्दा कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या उत्सवाप्रमाणेच पूर्व खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिवाळी उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादीत राहील याची दक्षता घ्यावी. उत्सव कालावधीत नागरीकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरीकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. दिपावली हा दिव्याचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणिमात्रांच्या आरोग्यावर परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्याची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.

या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम / कार्यक्रम उदा. दिवाळी पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्यांचे प्रसारण करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये याची दक्षता घ्यावी.कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत पोलिस व स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad