Breaking

Post Top Ad

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

"आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना सीएसआर फंडातून लाभ द्या":जिल्हाधिकारी सिंह

"आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना सीएसआर फंडातून लाभ द्या":जिल्हाधिकारी सिंह
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात  ‘मिशन उभारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या मदतीसोबतच विविध योजनेंतर्गत अशा कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू ही करण्यात आली. मात्र जे कुटुंब शासकीय योजनांच्या निकषात बसत नाही किंवा शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये अपात्र ठरतात, अशाही कुटुंबांना उभे करणे आवश्यक आहे. या कुटुंबांना सीएसआर फंडमधून लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

स्टेट बॅकेची 'कर्ज समाधान योजना'

एसबीआय च्या शाखेतून कृषी कर्ज, व्यवसाय कर्ज, व्यक्तिगत कर्ज, थकितदारांसाठी कर्ज तडजोडीसाठी विशेष एकरकमी परतफेड सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. यानुसार संबंधितांचे कर्जखाते योजनेच्या तारखेप्रमाणे असावे. मुद्दल व व्याजामध्ये सुट देऊन सदर खाते बंद करण्यात येईल. खाते एनपीए झाल्यानंतरच्या व्याजामध्ये १०० टक्के सूट, बँकेकडून कोणतेही खाते नसल्याचा दाखला, बोजा कमी करण्याचे पत्र लगेच दिले जाईल. तडजोड झालेल्या खातेदारांना पुन्हा कर्ज घेण्याची सोय. तसेच एकरकमी परतफेड करणाऱ्यांना, विशेषता महिला व मयत खातेधारकांना अधिक सवलत देण्याची सुविधा. त्यामुळे संबंधितांनी थकीत कर्जातून मुक्त होण्यासाठी नजीकच्या एसबीआय बँकेत संपर्क करावा.

 

"आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना सीएसआर फंडातून लाभ द्या":जिल्हाधिकारी सिंह

‘मिशन उभारी’ अंतर्गत सीएसआर फंडबाबत आयोजित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी.आर. रामटेके आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांपैकी लाभ दिला जातो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तालुकास्तरीय यंत्रणेसह प्रत्येक आठवड्याला मुख्यालयी बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करण्यात प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यातून सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, उदरनिर्वाहाचे साधन, शेतजमीन आदींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळते. बहुतांश कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी शेळी, गाय, म्हैस आदींची मागणी केली आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत दुधाळ जनावरांचे वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीसुध्दा काही कुटुंब अटी, शर्ती किंवा निकषात बसत नसल्यामुळे ते लाभांपासून वंचित राहतात. त्यामुळेच कंपन्यांच्या सीएसआर फंडमधून अशा कुटुंबांना आर्थिक मदत करणे, हा मुख्य उद्देश आहे.


शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या अपेक्षा खुप नाही. त्यांना दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी कंपन्यांच्या किंवा बँकांच्या निधीमधून दुधाळ जनावरांचे वाटप केले तर त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित चालण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते भारतीय स्टेट बँकेच्या कर्ज समाधान योजनेच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. यावेळी एसबीआयचे मुख्य प्रबंधक, अरुण अटकळीकर, जिल्हा समन्वयक गिरीश कोनेर यांच्यासह जिल्हा उद्योग केंद्र, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, एसीसी सिमेंट कंपनीचे प्रतिनिधी तसेच विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad