Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

'अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश'

'अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश'
पांढरकवडा, पुसद, दिग्रसची कामगिरी सुधरविण्याचे निर्देश
यवतमाळ, दि.३१ : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणायचा असेल तर ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट ही त्रिसुत्री अतिशय महत्वाची आहे. काही तालुक्यांमध्ये याची चांगली अंमलबजावणी होत आहे तर काही तालुक्यांची कामगिरी निराशाजनक आहे. यात सुधारणा करायची असेल व कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवायचा असेल तर तालुकास्तरीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात नव्हे तर प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.
उद्या मद्य विक्री बंद
जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाच्यावतीने बकरी ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाबाबतच्या उपाययोजने संदर्भात नियोजन सभागृहात यवतमाळ, पुसद, दिग्रस, वणी, पांढरकवडा, आर्णी या तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग), तपासणीकरीता जास्तीत जास्त नमुने पाठविणे (टेस्टिंग) आणि योग्य उपचार (ट्रिटमेंट) या सुत्रानुसार कार्यवाही केली तर निश्चितच यश मिळते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, पांढरकवडा, दिग्रस व पुसदमध्ये मोठ्या प्रमाणात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेने गांभिर्याने कामे करावी. केवळ काही भाग प्रतिबंधित घोषित करून चालणार नाही, तर त्या भागात अधिका-यांनी सकाळी ८ वाजतापासून प्रत्यक्ष उपस्थित राहून उपाययोजना कराव्यात. कोणत्या अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहावे, हे नियोजन उद्यापासूनच करा. जिल्हास्तरावरून याची पडताळणी करण्यात येईल. यात अधिकारी दिरंगाई करतांना आढळले तर त्याची गंभीर नोंद घेतली जाईल, असे त्यांनी बजावले.

तालुकास्तरावर ॲन्टीजन टेस्ट किट देण्यात आल्या आहेत. त्या त्वरीत उपयोगात आणा. तसेच हाय रिस्क, लो रिस्क व लो टू लो रिस्कबाबतची नोंद, पाठविलेल्या नमुन्यांची नोंद त्वरीत करा. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किंवा त्या भागातील नागरिकांचे नमुने उशिरा पाठविले तर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नमुने उशिरा पाठविले तर तेवढी मेहनत अधिक पटीने करावी लागते, ही बाब लक्षात ठेवून सर्वांनी काम करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

यावेळी त्यांनी आपापल्या भागात किती प्रतिबंधित क्षेत्र आहे, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह किती, सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझेटिव्ह किती, हाय व लो रिस्कचे किती नमुने तालुक्यातून पाठविले, ॲन्टीजन टेस्ट किट किती उपयोगात आणल्या, सारी, आयएलआय तसेच को-मॉरबीड (पूर्व व्याधींनी ग्रासलेले) नागरिकांची आरोग्य तपासणी, कॉलसेंटरवरून रोज किती कॉल होतात, ग्रामस्तरीय समितीचे कार्य आदी प्रश्नांचा भडीमार केला. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, डॉ. व्यंकट राठोड, डॉ. शरद जावळे यांच्यासह संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न.प. मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा – डीएचओ डॉ. चव्हाण
जिल्हयात कोरोना रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. काही महिन्यांपूर्वी विशिष्ट भागातच कोरोनाचा प्रसार होता. परंतु आता जवळपास प्रत्येक तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरीता आरोग्य यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण यांनी केले आहे. कोरोना रुग्ण आढळुन येणारे क्षेत्र प्रतिबंधित केले जाते. त्यामुळे लोकांना बाहेर पडण्याची मनाई, सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन, मास्कचा वापर करणे आदी अशा सुचना दिल्या जातात. या सुचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर  दंडात्मडक कार्यवाही सुध्दा केली जाते. याचा राग ते आरोग्य  कर्मचा-यांवर काढतात. आरोग्य विभागामार्फत सारी, आयएलआयचा सर्व्हे करण्यात येतो. परंतु असे करत असतांना नागरिकांकडून आरोग्य‍ कर्मचा-यावर व शासकीय यंत्रणेवर हल्ला करणे, दगडफेक करणे, शिवीगाळ करणे, असे प्रकार भांबोरा, दिग्रस शहर, नेर शहर, उमरखेड शहर, पुसद शहर येथे आढळुन आले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे असून त्यामुळे कर्मचा-यांचे मनोबल ढासळत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad