कुठे पैसे तर कुठे सोने-चांदी; निवडणुकीच्या पूर्वसंध्येला रात्रभर कोंबिंग ऑपरेशन, ठिकठिकाणी राजकीय राडे !

 


महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात रात्रभर कोंबिंग ऑपरेशन. जळगावात २९ लाखांची रोकड व सोने-चांदी जप्त, डोंबिवली-वसईत राजकीय राडे.

Mumbai: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदारांना छुप्या पद्धतीने प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या संशयावरून राज्यभरात पोलिस आणि निवडणूक यंत्रणांनी रात्रभर कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मौल्यवान दागिने जप्त करण्यात आले, तर डोंबिवली, वसई-विरार आणि मुंबईतील काही भागांत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावपूर्ण संघर्ष पाहायला मिळाला.

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये युतीतील मित्र पक्षांमध्येच संघर्ष उफाळून आला. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मैत्रीपूर्ण लढत सुरू असतानाच पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. हा वाद इतका चिघळला की त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप उमेदवाराचे पती सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह पाच जणांविरोधात कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा उपचार घेत असलेले शिवसेना उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ही प्रशासकीय दडपशाही असल्याचा आरोप केला आहे. तर माझ्या पतीच्या जिवाला काही झाले तर त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा नितीन पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांनी दिला आहे. सध्या डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगावमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने मोठी कारवाई केली आहे. ममुराबाद नाका परिसरात नाकेबंदी दरम्यान एका कारची झडती घेतली असता तब्बल २९ लाख रुपयांची रोकड, ३ किलो चांदी आणि ८ तोळे सोने आढळून आले. कारमधील व्यक्तींनी हा मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील एका सराफ पेढीचा असल्याचे सांगितले. मात्र कोणतीही वैध कागदपत्रे किंवा पावत्या सादर न केल्यामुळे पोलिसांनी हा सर्व ऐवज जप्त करून सरकारी कोषागारात जमा केला आहे.

वसई-विरार भागातही मध्यरात्री प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. वसई पूर्वेतील वॉर्ड क्रमांक १९ मधील वसई फाटा आणि गांगडी पाडा परिसरात बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना पिशव्यांसह पकडल्याचा दावा केला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. मात्र पेल्हार पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोणतीही रोकड हस्तगत झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईतील बोरीवली पूर्वेतील वॉर्ड क्रमांक १४ मध्येही मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू राहिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मतदानाच्या अवघ्या काही तास आधी राज्यभरात घडलेल्या या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनापुढील मोठे आव्हान ठरले आहे.

--------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने