Breaking

Post Top Ad

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

'पांडुरंगाचा परलोक प्रवास अन् राज्यात हळहळ'

'पांडुरंगाचा परलोक प्रवास अन् राज्यात हळहळ'

देवानंद जाधव | 98 81 139 126 


यवतमाळ: विद्येचे माहेरघर पुणे...पुणे येथे काय ऊणे? असे म्हटले जाते. पण तेथे काय उणे आहे, हे नुकतेच अवघ्या जगाने ऊघड्या डोळ्याने बघीतले आहे. आघाडीच्या वृत्त वाहीनी "टिव्ही नाइस"चे पुणे येथील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला.

समाजातील प्रत्येक शोषित पिडीतांचा आक्रोश सातत्याने जगासमोर मांडणाऱ्या पांडुरंगाने स्वतः  जगाचा निरोप घेतला. नव्हे त्यांचा येथील मुर्दाड व्यवस्थेने बळी घेतला. आणखी असे किती पांडुरंगांचे छायाचित्र भिंतीवर टांगले जातील? हे काळाच्या पोटात दडले आहे. आप आपल्या घरादारावर तुळसी पत्र ठेऊन,किंबहुना कोणतेही सुरक्षा विषयक साधन ऊपलब्ध नसतांना देखील, प्रत्येक पत्रकार कोरोना नामक डोम्या नागाच्या शेपटी वर जणु पाय ठेऊन, वृत्तांकन करत आहेत.

कळत न कळत कोरोना बाधीत होऊन,योग्य सुख सोई अथवा ऊपचारा अभावी अनेक माय मावल्यांच्या कपाळावरील कुंकू पुसल्या जात आहे. हे राज्यकर्ते आणि प्रशासनाचे अपयश आहे. व्यवस्थेमधील "बांडगुळ "मुग गिळुन बसले आहेत. पुत्र वियोगाचे दुःख काय असते, हे भावनाहीन आणि दगडी काळजाच्या लोकांना कधी कधी कळेल?जिच्या पोटात आपण आकार घेऊन जन्माला येतो ती "माता "आणि जिच्या पोटात आपण कायमचं विसावतो ती माती, या माता आणि माती मधील वेलांटी म्हणजे माणसाचं जीवन आहे, हे जरी सुर्यप्रकाशाईतके सत्य असले तरी,व्यवस्थेची अव्यवस्था अनेकदा माणसाच्या अकाळी मृत्यूस कारणीभूत ठरत असते, हे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या अकस्मात मृत्यूने दाखवुन दिले आहे. 

आयुष्यात अनेक नागमोडी वळणं येत असतात, ति काही काट्यांनी तर काही फुलांनी भरलेली असतात, पण माणसाने नेहमी काटेरी वळनेच निवडायची असतात ,असा जणु तमाम  पत्रकारांच्या बिरादरीने प्रण केला असावा, पायात रुतलेला काटा पायातुन काढल्या वर जेवढे समाधान वाटते, तेवढे फुलांवरुन चालतांना वाटत नसते, बहुधा हा अनुभव बिरादरीने घेतला असावा ,पंचक्रोशीतील तमाम पत्रकारांचा मुलुख, "येथे दुश्मनी विकत घेतली जाईल" हे कपाळावर गोंदुनच घराबाहेर वृत्तांकन करण्यासाठी निघत असतो. समाजात अराजकता माजविणारे वखवखणारे डोळे आडव्या नजरेने पत्रकारांना टिपत असतात, तरीही जीव मुठीत घेऊन आपले ऊत्तरदाईत्व पार पाडण्यासाठी अनेक जण धडपडत असतात. 

अगदी तशीच धडपड करत असतांना, पांडुरंगाच्या जिंदगीची पडझड झाली. ऐन वळणावरच्या वयात त्यांना कोरोणा विषाणु ने कवेत घेतले. स्वतः च्या चिमण्या पाखरांचे दुधाचे ओठ सुकण्यापुर्वीच घरटं सोडुन दुर दुर ऊडुन गेलेत, ते कधीही न परतण्यासाठी, पुञ वियोगाचं दुःख असंख्य पुण्यवंत मातांनी भोगलयं सात मुलांच्या मृत्यू नंतर देवकीने कृष्णाला यशोदेच्या हवाली केलंय, पुत्र राज्याभिषेका ऐवजी रामाचा वियोग वनवास कौशल्येच्या नशिबी आला, आणि पाच पांडवांची माता असुनही कुंतीची कुस कर्णासाठी रिकामीच राहीली,  देव देवताही सुटल्या नाहीत अशा भोगातुन, आपण तर सामान्य माणसं आहोत,पण सामान्य माणसाने रुग्णवाहीके अभावी तडफडुन मरावं, हे अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे. आणि तिच बातमी ब्रेकींग न्युज बनावी हे बाप्पा पुण्याच्या पांडुरंगा....हे केवढं मोठं दुदैव आहे? व्यवस्थेच्या अक्षम्य दुर्लक्षीत धोरणामुळे, पांडुरंग रायकर हे परलोक प्रवासाला निघुन गेले आहेत, त्यांच्या जाण्याने परिवाराची आभाळाएवढी हानी झाली आहे, ती कधीही न भरुन निघणारी आहे, तरी देखील अश्रुंना न कवटाळता धैर्यानं संकटाचा सामना करण्याचं बळ रायकर परिवाराला मिळो हिच विधात्या चरणी प्रार्थना करतो...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad