भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली होती. तद्नंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्याच्या निषेध व्यक्त केला आहे. तसंच गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही देखील दिला आहे. माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांचा खरपूस समाचार घेत गंभीर प्रस्थितीला समोर जावावे लागेल अशा इशारा दिला आहेत.
“काही महिन्यापूर्वी हेच गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीचे दरवाजे ठोठावत होते. मला घ्या अशी विनंती करत होते,” असा गौप्यस्फोटही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. “शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.
“आपल्या पक्षातील नेत्यांना खूश करण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे. म्हणुन पवारांबद्दल बोललं की महान नेता असा भाजपात गोड समज आहे. त्यामुळे हा त्याचा भाग असु शकतो. हे ज्यांना नेता मानतात तेच नरेंद्र मोदी आपण शरद पवारांची करंगळी धरुन राजकारणात आल्याचं जगजाहीर पणे बोलतात. यांना करंगळी धरायला मिळणार नाही,” असा टोला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी लावला. “असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श सुध्दा करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल,” असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
