Breaking

Post Top Ad

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

"संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकास कामांना गती द्या";संजय राठोड

"संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विकास कामांना गती द्या";संजय राठोड

यवतमाळ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर  भर दिला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे डिसेंबर २०२० अखेर पूर्ण करावी असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथील विविध विकास कामांचा आढावा राठोड यांनी आज मंत्रालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी 'युनायटेड वेस्टर्न कंपनी' सोबत मुंबईच्या विक्रोळीमध्ये १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडीसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या लागवडीसाठी ३३ लाख रुपये कंपनीकडून आणि ४ लाख रुपये 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'कडून देण्यात येणार आहेत.यावेळी महाराष्ट्र कांदळवन फाऊंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळाचे उदघाटन वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र सुरक्षा बलामार्फत  कांदळवनाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक घेतले आहेत. त्यापैकी कर्तव्यावर असतांना  तुषार  आव्हाड या सुरक्षा रक्षकाचा २२ सप्टेंबर रोजी  कोविड-१९ मुळे मृत्यू झाला. या  गार्डच्या कुटुंबीयांना २ लाखाची तत्काळ मदत वनमंत्र्यांनी कांदळवन फाऊंडेशनच्या निधीतून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

कांदळवन निसर्ग उद्यान दहिसर येथे नियोजित असून त्या बाबतचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. वडाळा येथील नियोजित कांदळवन कक्ष कार्यालय तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विश्राम गृह व समिती कक्ष बाबतही सादरीकरण करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, सह सचिव गजेंद्र नरवणे,  कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसरक्षक विरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक निनू सोमराज, विभागीय वन अधिकारी डी.आर पाटील यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे राज्याचे वनबल प्रमुख डॉ. एन.रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad